नवी दिल्ली – भारतात करोना चाचणीचा आकडा आठ कोटी पार गेला आहे. मागील 10 दिवसांत देशात तब्बल 1 कोटी करोना चाचण्या करण्यात यश आले.
जगात अमेरिका आणि चीननंतर भारत सर्वाधिक करोना चाचण्या करणारा तिसरा देश ठरला आहे. देशात आतापर्यंत 8 कोटी 10 लाख 80 हजारांपेक्षा जास्त करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही भारताची 130 कोटींची अवाढव्य लोकसंख्या पाहता या चाचण्या खूपच कमी आहेत.
भारतात अजूनही करोनाचा संसर्ग सुरूच आहे. कठोर उपाययोजना करूनही भारताला हवे तसे करोनाला रोखण्यात यश आलेले नाही. देशात 15 ऑक्टोबरनंतर बऱ्याच प्रमाणात सूट दिली जाणार असल्याने हा धोका आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे भारतात करोना चाचण्याही वाढवण्यात आल्या असून करोना पॉझिटिव्ह रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. ही चाचणी दिवसागणिक वाढत जाणार असल्याचेही केंद्र सरकारने सांगितले आहे.