-अरुण गोखले
नित्याचे स्नान हा मानवी जीवनातील दिनक्रमाचा एक विशेष महत्त्वाचा कार्यक्रम आहे. स्नानास शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. स्नानाने शरीराची बाह्यशुद्धी, स्वच्छता होते. उचित प्रसंगी उचित प्रकारे केलेले स्नान माणसास सुखावून जाते.
उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होत असताना केलेले गार पाण्याचे स्नान आणि थंडीच्या दिवसांतील स्नानास वापरलेले गरम पाणी हे आपल्यास सुखावून जाते. अशा स्नानाने मन प्रसन्न होते. चित्तवृती प्रफुल्लित होतात. कार्य उत्साह वाढतो. मनाची मलिनता दूर होते. वृत्तींचा पालट घडून येतो. दुष्ट नकारात्मक विचार मनातून दूर होतात. शुद्ध सात्विक सकारात्मक विचारांचे धन वाढीस लागते.
स्नानाने जसे आपल्याला तनामनाचे आरोग्य साधायचे असते. त्याप्रमाणेच काही पवित्र अशा तीर्थक्षेत्राच्या पवित्र नद्यांचे स्नान हे आपल्या पदरात पुण्य देऊन जाते. त्यातच दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास हा तर आपल्याला या महिन्यातील अशा पवित्र स्नानांनी अधिकच पुण्य देऊन जातो.
अधिकमासातील नित्य पवित्र स्नान करून दानधर्म करावा.
अधिकमास माहात्म्याच्या सोळाव्या अध्यायात दुर्वास ऋषींच्या शापाने पिशाचिनी झालेल्या एका स्वर्गीय अप्सरेला याज्ञवल्क ऋषीची कन्या कांची हिच्याकडून अधिकमासातील स्नान पुण्याईचे दान मिळताच तिचा कसा उद्धार झाला ही कथा आलेली आहे. तर याच महात्म्याचा सतरावा अध्याय आपल्याला तीन दिवसांच्या स्नान पुण्याईने एका विप्राने एका ब्रह्मराक्षसाचा कसा उद्धार केला ही कथा सांगते. या कथा आपल्याला नकळतच अधिक मासातील पुण्यदायी स्नानाचे महत्त्व सांगून जातात.
या महिन्यातले आणि त्यातही गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, पंचगंगा, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, गोदावरी ह्या सारख्या नद्यांचे आणि तेही जर त्या क्षेत्री जाऊन स्नान घडले. पवित्र नद्यांच्या संगम स्थानी जाऊन स्नान करण्याची संधी मिळाली, तर असे या मासातील पवित्रस्नान आपल्याला अधिकच फलदायी ठरत असते.