-प्रा. रंगनाथ कोकणे
लॉकडाऊनच्या काळात जगभरातील पक्षीजीवनात खूप सकारात्मक बदल घडून आलेले दिसले. पक्ष्यांसाठी हे जग अधिक चांगले आणि राहण्याजोगे बनले आहे. पक्ष्यांच्या आवाजातूनसुद्धा हा बदल जाणवू लागला आहे.
परिस्थितिकीय व्यवहार क्षेत्रातील शास्त्रज्ञ लिज डेरीबेरी यांचे सहकारी पक्ष्यांचा अभ्यास करीत असताना त्यांना काही आश्चर्यजनक वास्तव उमगले आहे. लिज डेरीबेरी या एका विशिष्ट जातीच्या पक्ष्यावर गेल्या दहा वर्षांपासून संशोधन करीत आहेत, हे प्रारंभी लक्षात घेतले पाहिजे. शहरांमधून वाढणाऱ्या कोलाहलामुळे पक्ष्यांची संवाद साधण्याची क्षमता कशी बाधित झाली आहे, याविषयी त्यांनी सविस्तर मांडणी केली होती. या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनच्या कालावधीत पक्ष्यांचे आवाज अधिक आनंदी झाले होते, ही चांगली बातमी आहे.
कोविडच्या महामारीमुळे सॅन फ्रान्सिस्को येथील सर्व व्यवहार बंद होते आणि लोक आपापल्या घरात होते, तेव्हा हा अभ्यास सुरू करण्यात आला होता. पक्ष्यांच्या आवाजाचा पाठलाग करण्यात आला. पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करण्यात आले. लॉकडाऊनच्या आधीचे विशिष्ट पक्ष्यांचे आवाज आणि लॉकडाऊननंतर त्याच प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज यांच्यात तुलना करण्यात आली. आधीच्या तुलनेत लॉकडाऊनमध्ये पक्ष्यांचे स्वर अधिक सुमधुर आणि सुस्पष्ट असल्याचे आढळून आले.
अर्थात, करोनाचे संकट येण्यापूर्वी मानवी आवाज प्रचंड प्रमाणात होते. शिवाय, वाहने आणि यंत्रे आदींचा कोलाहल प्रचंड प्रमाणात होता. त्यामुळे पक्ष्यांचे आवाज तसेही दाबलेच जात होते. सॅन फ्रान्सिस्कोच्या मोकळ्या रस्त्यांवरून फिरून पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करून डेरीबेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असे स्पष्ट केले की, लॉकडाऊनच्या काळात पक्ष्यांच्या आवाजाची गुणवत्ता आणि त्यातील दक्षता यांच्यात नाट्यमय फरक पडला आहे. पक्ष्यांमधील नर अधिक सुरात गातात. त्यांना आपल्या वावरक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी तसेच नवीन साथीदार शोधण्यासाठी त्यांच्या कंठातील उपजत संगीताचाच आधार घ्यावा लागतो.
टेनेसी विद्यापीठातील संशोधक सांगतात की, पक्ष्यांचे आवाज लॉकडाऊनच्या काळात अपेक्षेपेक्षाही अधिक बदलल्याचे दिसून आले आहे. पक्ष्यांच्या आवाजाचे आणि त्यांच्या दुनियेचे प्रदूषणामुळे किती नुकसान होते, हे यावरून दिसून येते. आपण प्रदूषण आणि अनावश्यक ध्वनिप्रदूषणाला आळा घातला तर पक्ष्यांची दुनिया पुन्हा एकदा रंगीबेरंगी होऊ शकेल. त्याचा आपल्यालाही फायदाच होईल. एका शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले शहरी वन्यजीवांवर महामारीच्या प्रभावांचे हे पहिलेच संशोधनात्मक मूल्यमापन आहे. हे संशोधन एका जटिल विषयावर प्रकाशझोत टाकणारे आहे आणि आपल्याला काही संकेत देणारे आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रचंड ध्वनिप्रदूषणामुळे निसर्गाचे किती नुकसान होते, हे यावरून आपण समजून घेतले पाहिजे.
आजकाल मानवी समाज संपूर्ण जगभरात प्रदूषण वाढविण्याचेच काम करीत आहे. संशोधकांचे म्हणणे असे आहे की, काही दिवसांच्या लॉकडाऊनमुळे जर पक्ष्यांच्या जीवनावर एवढा सकारात्मक परिणाम होत असेल, तर आपण परिश्रमपूर्वक हवेचे, पाण्याचे आणि आवाजाचे प्रदूषण नियंत्रणात ठेवले, तर हे पक्षीविश्व कायमस्वरूपी हसते-खेळते आणि गाते-बागडते राहू शकेल. संपूर्ण जीवसृष्टीलाच याचा फायदा मिळू शकेल आणि तो अंतिमतः मानवजातीपर्यंत पोहोचणारच आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जर विशिष्ट जातीचे पक्षी नवी गीते गाऊ लागल्याचे दिसून आले असेल, तर जगातील अन्य शहरांमधील पक्ष्यांच्या बाबतीतही हेच घडले असेल, हे निश्चित आहे.
आपल्याकडेही अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात हे बदल अनुभवले असतील. पक्ष्यांच्या तणावाचा स्तर लॉकडाऊनच्या काळात घटला असावा, असे संकेत या संशोधनातून मिळत आहेत. विशेषतः शहरी पक्ष्यांचे आयुष्य प्रदूषणाचा स्तर कमी केल्यास पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. जे पक्षी ग्रामीण भागात दिसतात, त्यांच्याविषयीचे संशोधन असे सांगते की, लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनच्या काळात अशा दोन्ही वेळी त्यांच्या आवाजाची गुणवत्ता एकसमान होती.
आणखी एक सकारात्मक बदल असा झाला आहे की, अंगणात पक्षी येण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदविले आहे. पक्ष्यांचा हा सहवास माणसाला हवाहवासा तर वाटतोच; शिवाय तो गोड कोलाहल आपले ताणतणावही कमी करतो. म्हणजेच, पक्ष्यांचा आनंद हा केवळ त्यांच्यापुरताच सीमित राहत नाही. सुमधुर गीतांच्या माध्यमातून पक्षी तो आपल्यापर्यंत पोहोचवितात.