मुंबई- महाराष्ट्राचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशी आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवायला सज्ज झाला आहे. गोदावरी नावाचा चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाचं पोस्टर त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.
2 डिसेंबर, 1997 रोजी काही स्वप्नं घेऊन मी मुंबई मध्ये दाखल झालो. गेल्या 23 वर्षात मला या शहराने आणि इथल्या माणसांनी भरभरून प्रेम दिले. शहाणं केलं. आज एक पाऊल पुढे टाकत मी माझ्या मित्रांसोबत आमचा पहिला चित्रपट निर्माण करायचं धाडस करतोय. तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू देत, अशी पोस्ट करुन त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आणि पाठिंबा मागितला.
चित्रपट, छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाने अभिनेता जितेंद्र जोशीने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. दमदार अभिनेता अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. दुनियादारीमधील साई असो किंवा मग तुकाराम चित्रपटातील संत तुकारामांची आव्हानात्मक भूमिका, प्रत्येक भूमिकेला जितेंद्र जोशी तितक्याच सहजसुंदर अभिनयाने न्याय देतो.
दरम्यान, या चित्रपटासाठी अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी पोस्ट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हा चित्रपट नेमका कधी येणार याबाबतची घोषणा लवकरच जितेंद्र जोशी करणार असल्याचंही समजतंय.