मुंबई – काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या केरळ स्टोरी या चित्रपटावरून बराच गदारोळ माजला होता. तो अद्याप शांत झालेला नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता सोशल मीडियावर जे काही नवे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत त्यावर खुलासा केला आहे. त्यांनी आपली बाजू मांडली असून चित्रपटाच्या संदर्भात नव्याने केले गेलेले दावे फेटाळून लावले आहेत. हे करतानाच त्यांनी यूट्यूब आणि ट्वीटरवर दावे करणाऱ्या स्वयंघोषित प्रभावशाली व्यक्तींवरही निशाणा साधला आहे.
चित्रपटाच्या संदर्भात अपप्रचार करणाऱ्यांचे दावे खोडून काढण्यासाठी निर्मात्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. नक्की किती मुलींचे धर्मांतर झाले होते यावर सध्या गरमागरमीने चर्चा होत आहे. त्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले आहे. 32 हजार पेक्षा जास्त मुलींचे धर्मांतर करण्यात आले.
त्यांचा ब्रेनवॉश करत त्यांना सुनियोजितपणे आयएसआयएस या दहशवादी संघटनेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न केला गेला असे यात म्हटले आहे. 24 जुलै 2010 हा दिवस भारतीय संविधानासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंद यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली होती.
या परिषदेत ते 27 मिनीटे बोलले. येत्या 20 वर्षांत केरळ हे पूर्णत: इस्लामिक राष्ट झालेले असेल असा इशारा त्यांनी तेंव्हा दिला होता. केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनीही तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे पूर्णपणे समर्थन केले होते असा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला. 25 जून 2012 रोजी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी केरळ विधानसभेत जाहीर कबुली दिली होती. पूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होते आहे. केरळमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे ते म्हणाले होते याकडेही निर्मात्यांनी लक्ष वेधले आहे.
चित्रपटात ब्रेनवॉश करून धर्मांतर झालेल्या मुलींची नक्की संख्या किती यावर बराच वाद सुरू आहे. अगोदर 32 हजार सांगण्यात आले होते. ती संख्या आता केवळ तीन सांगितली जाते आहे. त्याबाबत बोलताना निर्माते विपूल अमृतलाल शहा म्हणाले, आमची यंत्रणा कोणीतरी पाच मिनिटांसाठी हॅक केली होती. त्या काळात हा आकडा 32 हजारवरून 3 करण्यात आला. सायबर पोलिसांनी याचा स्क्रिनशॉटही घेतला आहे.
सोशल मीडियावर आमची खिल्ली उडवण्याचा आणि आम्हाला चुकीचे सिध्द करण्याचा ट्रेंड सुरू करण्यात आला. मात्र आम्ही जेंव्हा आकडा पुन्हा 32 हजार केला तेंव्हा यावर कोणी प्रतिक्रिया दिली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. केवळ 2500 धर्मांतराची प्रकरणे झाली असा दावा यूट्युबवर केला जातो आहे. त्याचा खुलासा करताना शहा म्हणाले की जर तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी विधानसभेत मांडलेली अधिकृत आकडेवारी 7713 होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.