सोरतापवाडी -उरुळी कांचनमधील दत्तवाडी येथील गणपती कारखानदारांनी पीओपीच्या गणपती मूर्तींवर असलेली बंदी हटवावी, अशा मागणीचे निवेदन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी आमदार अशोक पवार यांनी बंदी हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आप्पासाहेब डोंबे, अर्जुन कांचन, कांतीलाल काळे, संतोष कांचन, आप्पासाहेब वाघमोडे, राहुल राऊत उपस्थित होते. उरुळी कांचन दत्तवाडी येथील गणपती कारखान्यातील गणपती मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात व परराज्यातही जात आहेत. ग्रामीण भागात पीओपी गणपतीची मागणी होत असून त्यावरील बंदी सरकारने हटवावी, अशी मागणी कारखानदारांकडून जोर धरू लागली आहे. करोना महामारीमुळे देशभरात मोठे संकट आले असून सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत, गणपतीभक्त जो गणपती कमी किमतीत भेटेल त्या गणपती मूर्तीची मागणी करीत आहेत. पीओपी गणपती मूर्तीपेक्षा शाडू मातीची मूर्ती तीन पटीने किमतीमध्ये महाग मिळत असून गणेश भक्तांकडून शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा पीओपी गणपती मूर्तीकडे घेण्याचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
गणपती मूर्तीचे विसर्जन हे एकच दिवसात होत असून गणपती कारखाने पूर्ण वर्षभर सुरू असतात. दत्तवाडी येथे वीस गणपती कारखाने असून यामध्ये अकराशे ते बाराशे कामगार आहेत. यामध्ये अधिक महिला कामगार आहेत. कारखान्यातील कामगारांवर कोरोना महामारी मुळे उपासमारीची वेळ आली असल्याचे ए वन कारखान्याचे मालक आप्पासाहेब डोंबे व कारखानदार राहुल राऊत व आप्पासाहेब वाघमोडे यांनी सांगितले.