पुणे – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकित्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहेत.
परीक्षेस 8 सप्टेंबरला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सुलभता याची काळजी घेत यंदा केंद्राच्या संख्येत वाढ केली आहे. राज्यातील 270 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षेस विद्यार्थ्यांची 95 टक्के उपस्थिती आहे.
परीक्षेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार केंद्र प्रमुखांना कळवले आहे. परीक्षा केंद्रावर सर्वांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर सोडिअम हायपोक्लोराईड सोल्यूशन व लिक्विड सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. परीक्षेचे विद्यापीठात सीसीटीव्हीद्वारे निरीक्षण करण्यात येत असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले.
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी 9 हजार 500पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज सादर केले आहेत. प्रत्येक विषयाच्या पेपरनंतर एका दिवसाचा खंड असून दि. 3 ऑक्टोबरपर्यंत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तद्नंतर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.