पुणे – खडकवासला, पानशेत, वरसगाव ही तीन धरणे 100 टक्के भरली आहे, तर टेमघर धरण 97.29 टक्के भरले आहे. खडकवासला धरणातून आजपर्यंत नदीमध्ये 11 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 29.05 टीएमसी म्हणजे 99.66 टक्के पाणीसाठा आहे.
शहराला खडकवासला प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या प्रकल्पात किती पाणी उपलब्ध आहे, यावर सर्वांचे लक्ष असते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. वरसगाव, पानशेत आणि टेमघर या धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे खडकवासला धरणात जमा होते. येथून ते नदीत सोडण्यात येते. हे पाणी उजनी धरणात जमा होते.
रविवारी दिवसभरात या चारही धरणांच्या क्षेत्रांत पावसाने विश्रांती घेतली. सध्या खडकवासला-100, पानशेत-100, वरसगाव-100 टक्के भरले आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणातून नदीमध्ये 856 क्युसेकने विसर्ग सुरू आहे, असे प्रशासनाने सांगितले.
राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
दरम्यान, पुढील दोन दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आगामी काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.