कामशेत – मावळात भात पिकाच्या पाठोपाठ उसावर देखील तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उसाची हिरवी पाने मोठ्या प्रमाणात पिवळी व तांबडी झाली आहेत. सध्या काही ठिकाणी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. मावळातील सुमारे 1794 हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड असून, तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
मावळात भाताबरोबर सध्या ऊस हे पीक महत्त्वाचे पीक मानले जाते. साखर कारखाना जवळच असल्याने मावळातील शेतकरी भातपीक त्यानंतर ऊस पिकास प्राधान्य देतात. तालुक्यात सुमारे 1794 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. तांबेरा रोगांच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवाला
घोर लागला.
सध्या ऊस शेतीवर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनात घट होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. त्यामुळे करपा, तांबेरा, तुडतुडे, तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर झाला आहे. त्याचा परिणाम उत्पादन घटण्यावर होऊ शकतो. रोग नियंत्रण व उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे.
…असा नियंत्रणात आणा तांबेरा
– शिफारस नसलेले वाण वापरू नये.
– शेतात पाण्यामुळे दलदल होऊ देऊ नये.
– रुंद सरी वापरून अथवा पट्टापद्धत वापरून लागवड करावी.
– रोग नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम 1 ग्रॅम अथवा मॅंकोझेब 2.5 ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल एक मिली किंवा कार्बेंडाझिम अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) एक ग्रॅम याबरोबर 1 मिली स्टिकर वापरून फवारणी घ्यावी. गरजेनुसार 15 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून पुढील फवारणी सल्ला घेऊन करावी. उशिरा व अधिक प्रमाणात नत्र खते वापरू नयेत.
मावळातील ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पाहणी करून रोगाच्या तीव्रतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी 15-15 दिवसांच्या अंतरावर करावी.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी.
शिफारस नसलेले वाण वापरल्याने तसेच शेतात साचलेल्या पाण्यामुळे दलदल झाल्याने तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. याकरिता रुंद सरी वापरून अथवा पट्टापद्धत वापरून उसाची लागवड करावी. तांबेरा रोग आटोक्यात आणण्यासाठी खोड किडीचा वापर करण्यात येणार आहे.
– एस. जी. पठारे, कार्यकारी संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना.