गेल्या काही महिन्यांमध्ये आत्महत्यांच्या घटनेत वाढ
पिंपरी – शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. किशोरवयीन मुले देखील आपले जीवन संपवत आहेत. नैराश्य, आजाराला कंटाळून, प्रेमभंग, तत्कालीन भांडण अशी विविध कारणे आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींना आधार देण्याची आणि संवादाचा सेतू उभारण्याची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचं म्हणणं किमान ऐकलं, तरी ही दिवसागणिक अजस्त्र होऊ लागलेली समस्या काही अंशी कमी करण्यास नक्कीच हातभार लागेल. प्रत्येक आत्महत्या करणारी व्यक्ती काही तिला जगायचं नसतं म्हणून हे पाऊल उचलत नाही. बहुतेक व्यक्तींना अस वाटतं, की आपली समस्या सुटू शकणार नाही. आत्महत्या केली की समस्याही संपेल, या विचारांमुळे या व्यक्ती आत्महत्येचा निर्णय घेतात, पण… तो निर्णय थांबू शकतो, तुम्ही ऐकू लागलात तर..
प्रत्येक नैराश्यग्रस्त व्यक्ती समुपदेशकांपर्यंत, मनोविकारतज्ज्ञांपर्यंत, हेल्पलाइनपर्यंत पोहोचेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाने आजूबाजूच्या व्यक्तींची थोडी काळजी घेतली, त्यांच्या वर्तनात काही बदल दिसल्यास, बोलण्यात सातत्याने नैराश्य जाणवल्यास थोडी खोलात जाऊन चौकशी केली, सल्ला देत न बसता ऐकून घेतले तरी त्या व्यक्तीला आत्महत्येच्या मार्गावरून परत आणणे शक्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार, दरवर्षी जगभरात सरासरी आठ लाख व्यक्ती आत्महत्या करतात. ताणतणाव, व्यसन, आजार, कर्ज, प्रेमभंग, विवाहबाह्य संबंध, कार्यालयीन ताणतणाव, पालकांच्या अवाजवी अपेक्षा, मुलांच्या स्वत:विषयीच्या अपेक्षा यांच्यासह अनेक कारणे आहेत. 20 टक्के आत्महत्यांमध्ये नेमकी कारणे सापडत नाहीत.
शहरामध्ये 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट अशा 8 महिन्यांच्या कालावधीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे 20 गुन्हे दाखल झाले आहेत. गतवर्षी याच कालावधीत 30 गुन्हे दाखल झाले होते.
– राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.
मानसिक संतुलन गमावल्याने व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होतात. आत्महत्येकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. दुबळ्या आणि कमकुवत मनाच्याच व्यक्ती आत्महत्या करतात असे नाही. तर, मनाने खंबीर असलेल्या व्यक्ती देखील आत्महत्येचा मार्ग निवडू शकतात. समाजाचा आत्महत्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आत्महत्येचा विचार येणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधणे गरजेचे आहे. त्यांना मानसिक आधार द्यायला हवा.
– डॉ. धनंजय अष्टूरकर, मानसोपचारतज्ज्ञ