इंद्रायणीनगर विद्युत रोहित्र स्फोट प्रकरण
पिंपरी – विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन उकळते ऑइल अंगावर पडल्याने पाच महिन्यांची लहान मुलगी, तिची आई व आजी असा तीन जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणचे अधिकारी सुनील रोटे आणि अन्य संबंधित अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप भगवान कोतवाल (वय 59, रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. 8) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शारदा दिलीप कोतवाल (वय 51), शिवन्या काकडे (वय 4 महिने) आणि हर्षदा सचिन काकडे (वय 32) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी कोतवाल यांच्या घराजवळ असलेला विद्युत रोहित्र नादुरुस्त होता. त्याबाबत कोतवाल यांनी महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना सांगितले होते. वारंवार सांगून देखील महावितरणकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नाही.
5 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता विद्युत रोहित्राचा बिघाड झाला. महावितरणच्या लोकांनी तो विद्युत रोहित्र काढून दुसरा विद्युत रोहित्र बसवले. मात्र ते देखील नादुरुस्त होते. त्याचा स्फोट झाला आणित्यातून उकळते ऑइल बाहेर पडले. ते उकळते ऑइल अंगावर पडल्याने तिघींचा मृत्यू झाला. याबाबत महावितरणच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.