संयुक्त राष्ट्रे – भारतात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याच्या नियंत्रणासाठी भारत सरकारतर्फे जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांची पथके तेथे सरकारच्या कामात मदत करीत आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रे सरचिटणिसांच्या प्रवक्त्याने आज येथील पत्रकार परिषदेत दिली.
भारतातील या कामाचे कोऑर्डिनेशन रेनेटा देस्सालिएन करीत आहो. या कामात जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफचे प्रशिक्षित कर्मचारीही कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या यूएनडीपी कार्यक्रमांतर्गत एक लाख स्थलांतरित मजुरांना सामाजिक सुरक्षा योजना पुरवण्यात आली असून एक लाख सफाई कामगारांना सुरक्षा पोषाख देण्यात आले आहेत. तसेच त्यांना चार हजार मेट्रिक टन अन्नधान्यही पुरवण्यात आले आहे.
यूएन पॉप्युलेशन फंडातर्फे 5300 सफाई कामगारांना घनकचरा व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले असून इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनही तेथे कामाला लावण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
करोनाच्या बाबतीत भारत हा आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे. त्यामुळे भारतात हे कार्य वेगाने हाती घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.