पुणे – सिंहगड रस्ता, कात्रज, सहकारनगर, धनकवडी तसेच इतर काही भागांस पाणीपुरवठा करणाऱ्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनी सकाळी पाचच्या सुमारास जळाली. त्यामुळे तब्बल सहा लाख पुणेकरांना शनिवारी फटका बसला.
सिंहगड रस्त्यापाठोपाठ पुढे, सहकारनगर, कात्रज, धनकवडी, आंबेगाव भागांतील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. पाणी न आल्याने या भागातील नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला. दुपारी तीननंतर वीजपुरवठा सुरळीत झाला असला, तरी पाण्याचे नियोजन कोलमडले होते. आता रविवारी नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने कळवले आहे.
सुमारे २५० एमएलडी क्षमतेचे हे जलकेंद्र असून या द्वारे संपूर्ण सिंहगड रस्ता तसेच सहकारनगर, धनकवडीच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो. त्यात, हिंगणे, आनंदनगर, वडगाव खुर्द आणि बुद्रुक, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रूक परिसराला पाणी पुरवठा केला जातो. पहाटे साडेचार पासून वेगवेगळ्या भागांत हे पाणी सोडण्यात येते. तसेच दाट लोकवस्तीच्या भागात हे पाणी दिले जात असल्याने अचानक पाणी न आल्याने नागरिकांना कसरत करावी लागली.
“जलशुद्धीकरण केंद्रातील वीजवाहिनी जळाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. दुपारी उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू होती. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. सायंकाळनंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.” – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, मनपा
“उन्हाळ्यामुळे जादा पाण्याची गरज भासते. शनिवारी सुट्टीमुळे कुटुंबीय सगळे घरीच होते. मात्र, उशिरापर्यंत पाणी न आल्याने तारांबळ उडाली. शेवटी वापरण्याचे पाणी विकत घ्यावे लागले. त्यानंतर, सोशल पाणी येणार नसल्याचा मेसेज सोशल मीडियावर दिसला.” – सुशील जाधव, नागरिक
“या वीज वाहिनीची नियमित देखभाल दुरूस्त करणे आवश्यक असते. त्यासाठी दोन महिन्यांपासून महापालिकेला पत्र पाठवून पाणी बंद ठेवण्याची मागणी केली जात होती. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर या वाहिनीत बिघाड झाला, मात्र, दुपारी ती दुरूस्त करण्यात आली आहे.” – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण