नवी दिल्ली : भारतीय प्रसारमाध्यमे केवळ सरकारचा अजेंडा आणि धोरणे रेटण्याचं काम करत आहेत असे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्हा यांनी भारतीय प्रसारमाध्यमे ही सरकारच्या बाजूने बोलत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सिन्हा यांनी आयोजित केलेल्या गांधी शांती यात्रेचा संदर्भ देत सिन्हा यांनी हे भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करताना, “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे,” असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सिन्हा यांनी भारतामधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत २२ दिवसांची गांधी शांती यात्रा केली होती. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोध करण्यासाठी सिन्हा यांनी काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या सोबतीने ही यात्रा केली होती. मात्र या यात्रेला प्रसारमाध्यमांनी म्हणावे तितके महत्व दिले नाही अशी खंत सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिन्हा यांनी प्रसारमाध्यमे ही सरकारच्या बाजूने असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “भारतीय प्रसारमाध्यमे मोदींच्या पाळीव कुत्र्याप्रमाणे वागत आहे. त्यामुळेच सध्या देशात वाईट परिस्थिती सध्या दिसून येत आहे. प्रसारमाध्यमे केवळ सरकारच्या इच्छेनुसार वागत आहेत असे नाही तर सरकारचा अजेंडा रेटण्यासाठी आणि सरकारला काय अपेक्षित आहे याचा अंदाज बांधून काम करत आहेत,” असा आरोप सिन्हा यांनी केला आहे.
केवळ प्रसारमाध्यमेच नाही तर हिंदुत्ववादी राष्ट्रवादाने न्याय व्यवस्थेबरोबरच इतर अनेक प्रभावशाली संस्थांवर वर्चस्व मिळवल्याचे चित्र दिसत आहे असं सिन्हा म्हणाले आहेत. भारतामध्ये फॅसिस्ट विचारसरणी वाढत आहे का या प्रश्नालाही सिन्हा यांनी उत्तर दिलं आहे. “मागील पाच ते सहा वर्षांमध्ये भारतामधील लोकशाही तत्वांचा प्रभाव कमी करण्यासंदर्भात जाणीवपूर्वक पद्धतीने काम करण्यात आलं आहे असं मी म्हणेन. मात्र देशातील लोकांमध्ये याविरोधात लढण्याची शक्ती आणि क्षमता आहे,” असं सिन्हा म्हणाले.