पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला आहे. काही महाविद्यालयांत विद्यार्थी, पालक यांची गर्दी होत आहे. आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येकाने प्रवेश निश्चित करावे, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले.
पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागांत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिली नियमित प्रवेश फेरी संपली असून आता दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू आहे. डेटा प्रोसेसिंगसाठी आता अर्जाचा भाग-1 व भाग-2 भरण्यासी सुविधा बंद केली आहे. पुढील प्रवेश फेरीसाठी 11 सप्टेंबरपासून अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी व त्यात बदल करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रत्यक्ष प्रवेश व डीजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. महाविद्यालयात विनाकारण प्रवेशासाठी गर्दी होत आहे. करोना पार्श्वभूमीवर सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कोणत्याही कारणास्तव महाविद्यालयांमध्ये गर्दी होता कामा नये. वेळोवेळी जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रवेश ऑनलाइनच निश्चित करता येतील, अशा सुविधा महाविद्यालयांनी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.