पुणे – अकरावी प्रवेशासाठी आणखी एक अतिरिक्त फेरी घेण्यात येणार आहे. दि.16 ते 22 नोव्हेंबर आणि 23 ते 30 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत अखेरची विशेष फेरी राबवण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच महानगर क्षेत्रात अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेअंतर्गत तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी, तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वानुसार दोन फेऱ्या झाल्या.
या फेऱ्यांतून बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. तसेच अनेक महाविद्यालयांमधील अध्यापनाचे कामकाज, नियमित वर्ग सुरू झालेले आहेत. प्रथम सत्र समाप्त झालेले असून काही विद्यार्थी प्रवेश मिळण्यासाठी विनंती करत आहेत. त्यात साधारणपणे मुंबईतील 145, पुण्यातील 33 , नाशिकमधील एक, अमरावतीमधील तीस आणि नागपूरमधील चौदा अशा एकूण 223 विद्यार्थ्यांनी उपसंचालक कार्यालयाकडे प्रवेशासाठी विनंती केली आहे. मात्र, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी मिळण्यासाठी अकरावी प्रवेशाचा कालावधी वाढवण्यात आल्याचे पालकर यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना विशेष फेरीच्या पहिल्या टप्प्यात 16 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत नावनोंदणी ते प्रवेश घेता येईल, तर 23 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत उपसंचालक कार्यालय स्तरावरून समुपदेशनाद्वारे विद्यार्थ्यांची नाव नोंदणीपासून विद्यालयात प्रवेश घेण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.