दि. 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार
पुणे – इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर झाली. यात 38 हजार 858 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने दि. 30 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
विज्ञान शाखेतून सर्वाधिक 19 हजार 153, वाणिज्य शाखेत 15 हजार 250, कला शाखेत 3 हजार 834 आणि व्होकेशनल अभ्यासक्रमात 621 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या 33 हजार 197 विद्यार्थ्यांना ऍलॉट जाहीर झाले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार अकरावीची पहिली फेरी राबविण्यात येत आहे.
शुक्रवारी पहिली गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे कटऑफ गुण जाहीर झाले. पुणे विभागातून 311 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 11 हजार 205 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीतील 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालय ऍलॉट जाहीर झाले.
दि. 30 ऑगस्ट रोजी सायं. 5 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. इतर माध्यमांमध्ये सीबीएसई 4 हजार 33 हजार, आयसीएसई 1 हजार 406, आयजीसीएसई 27, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग 79, इतर माध्यमांचे 112 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले. कला शाखेतून पहिल्या पसंतीक्रम दिलेल्या 2 हजार 456 आणि वाणिज्य शाखेतून 8 हजार 570, तर विज्ञान शाखेतून 22 हजार 665 जणांना प्रवेश जाहीर झाला.
प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गर्दी करू नका
अकरावीची सर्व प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याचे काही कागदपत्रे अपलोड करायची राहिले असतील तर त्यांना त्याच्या लॉगीनमध्ये जाऊन कागदपत्रे अपलोड करता येतील. कॉलेज लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे पाहता येतील. त्यामुळे कागदपत्राचे कारण देऊन विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात गर्दी करू नये. तसेच “पेमेंट गेट वे’द्वारे शुल्क भरावे लागणार आहे.
नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ
अकरावी प्रवेश निश्चित करताना ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र नाही, त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची प्रत अथवा पावती अपलोड करावी. अशा विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत मिळेल. या मदतीत हे प्रमाणपत्र सादर केले नाही, तर प्रवेश रद्द केला जाणार असल्याचे अकरावी प्रवेश समितीने स्पष्ट केले.