पुणे – सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र खासगी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गावांच्या विकासासाठी चांगला असून, जिल्हा परिषदेने कंपनी स्थापन करावी. राज्य सरकार त्यावर धोरणात्मक निर्णय घेईल, असे अश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
जिल्हा परिषदेच्या राज्य सरकारकडील प्रलंबित प्रश्नांचा पवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे उपस्थित होते.
यावेळी घनकचरा व्यवस्थापनबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी या व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषद स्वतंत्र कंपनी स्थापन करत असल्याची माहिती शिवतरे आणि काकडे यांनी पवार यांना दिली.
त्यावर हा विषय मार्गी लावण्यासाठी लवकरच ग्रामविकास, महसूल, पर्यावरण, उद्योग उर्ज आदींसह विविध विभागांची संयुक्त बैठक घेण्याची ग्वाहीही पवार यांनी यावेळी दिली.