विकासदर कोसळल्याचा परिणाम नाही
मुंबई – सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीचा विकासदर 23.9 टक्के होणार आहे. तरीही ऑगस्ट महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतात 6 अब्ज डॉलरची म्हणजे 48 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
मार्च महिन्यापासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजाराकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये बरीच गुंतवणूक झाली. भारताचा विकासदर कोसळला असला तरी तो लगेच वेगात वाढू शकतो. अर्थमंत्रालयाचे सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी गेल्या आठवड्यात भारताचा विकासदर ज्या वेगाने कमी झाला त्याच वेगाने वाढणार असल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे भारतात गुंतवणूक होत असल्याचे विश्लेषकांना वाटते. ऑगस्ट महिन्यामध्ये आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी, ऍक्सिस बॅंक, रिलायन्स या कंपन्यांमध्ये परकीय गुंतवणूक वाढली. न्यूयॉर्कमधील एका गुंतवणूक कंपनीचे सल्लागार नॅनो फर्नांडिस यांनी सांगितले की, पुढील 12 ते 24 महिन्यांमध्ये आम्ही भारतामध्ये तुलनेत जास्त गुंतवणूक करायचे ठरविले आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये परदेशी गुंतवणुकीचा भारतातील शेअरबाजारात ओघ कायम आहे. पहिल्या तीन दिवसांत या गुंतवणूकदारांनी 250 दशलक्ष डॉलरच्या शेअरची खरेदी केली आहे. ही खरेदी आगामी काळातही चालू राहण्याची शक्यता आहे.
रुग्ण वाढल्यास परिणाम होईल
आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी असले तरी जर करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढली तर भारतातील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा परदेशी गुंतवणूकदारांच्या सल्लागारांनी दिला आहे. ख्रिस्ती फार्मन यांनी सांगितले की, जर या आठवड्यात ज्या वेगात रुग्ण वाढले असेच रुग्ण काही आठवडे वाढले तर आम्हाला गुंतवणुकीबाबत फेरविचार करावा लागेल.