कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पुणतांबा येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तातडीने बांधून द्यावे व खराब झालेला रस्ता दुरुस्त करावा, याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे केलेल्या मागणीची पालकमंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी येवून या पुलाची पाहाणी केली.
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे गोदावरी नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आला असून या बंधाऱ्याचे बाजूचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे व अनेकवेळा पूल पाण्याखाली गेल्यामुळे या पुलावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण खराब झाल्यामुळे या पुलावरून नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत होती. या बंधाऱ्याचा पुणतांबा, डोणगाव, बाबतरा, वारी, कान्हेगाव, लाख, पुरणगाव आदी गावातील नागरिकांना मोठा उपयोग होत होता. मात्र बंधाऱ्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे या बंधाऱ्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते.
कोपरगाव, राहाता व वैजापूर तालुक्यातील नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनमुश्रीफ यांच्या समवेत झालेल्या बैठकीत त्यांच्याकडे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्याबाबत पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार पाटबंधारेचे सहाय्यक अभियंता महेश गायकवाड, सिंचन शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी बंधाऱ्याची पाहाणी केली.