राजगुरूनगर (प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील चास कमान धरण १०० टक्के भरले असून ५ दरवाजे उघडण्यात आले. त्यातून ९२५ क्यूसेस वेगाने पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. पावसाच्या प्रमाणावर धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार असून नदी पात्रात कोन्ही उतरू नये असे आवाहन शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी केले आहे.
खेड तालुक्यातील चास कमान धरण रात्री १०० टक्के भरले. आज (दि.३०) सकाळी १० वाजता धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून ९२५ क्यूसेस वेगाने भिमानदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून ८५० क्यूसेस पाणी सोडले जात असून ते पुढे डाव्या कालव्यातून ४५० क्यूसेस व भीमनदीत ४०० क्यूसेस वेगाने सोडले जात आहे.
चास कमान धरण यावर्षी उशिराने भरले आहे. मागील वर्षी ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात धरण भरले होते. त्यावेळी अतिवृष्टी झाली होती. धरणातून सुमारे ६० हजार क्यूसेस वेगाने त्यावेळी पाणी सोडण्यात आले होते.
भोरगिरी भीमाशंकर व चास कमान धरण परिसरात पावसाचे प्रमाण रात्री पासून वाढले आहे. धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून सांडव्याद्वारे जादा पाणी सोडण्यात येणार आहे. भीमानदी काठाच्या नागरिकांनी पाण्यात उतरू नये. असा सतर्कतेचा सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.