नवी दिल्ली – करोनाचा धोका कमी झाल्यानंतर सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटला प्रारंभ होऊ शकेल, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
भारतात दरवर्षी देशांतर्गत क्रिकेटचा मोसम ऑगस्ट महिन्यातच सुरू होतो. मात्र, यंदा करोनाचा धोका वाढल्याने अद्याप स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक तयार करता येत नसल्याने निश्चित तारीख इतक्यात जाहीर करता येणार नाही. यंदा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा प्रारंभ सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेसह स्थानिक क्रिकेटचा मोसम सुरू करण्याचा विचार आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.
परिस्थितीत सुधारणा झाली तरच देशांतर्गत स्पर्धा सुरू करता येतील. मात्र, या स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडू आणि निगडित व्यक्तींचे आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या सर्व बाबींवर सातत्याने निरीक्षण करीत आहे, असे गांगुली यांनी संलग्न संघटनांचे अध्यक्ष आणि सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यावेळी गांगुली यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाचीही माहिती सर्व संघटनांना दिली. येत्या डीसेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तसेच 2021 सालाच्या प्रारंभी भारतीय संघ मायदेशातच इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. याशिवाय पुढील वर्षी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे आणि 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धाही भारतातच होणार आहे. यानंतर एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) देखील सरू करण्यात येणार आहे, असेही गांगुली यांनी सांगितले.
महिलांच्या स्पर्धांबाबत लवकरच निर्णय..
भारतीय संघ ज्या मालिका खेळणार आहे त्याचबरोबर महिला संघाच्या स्पर्धांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून क्रिकेट ठप्प असल्याने महिलांच्या स्पर्धा सुरू करत असताना त्यांच्यासाठी सराव शिबिराचेही आयोजन करणे आवश्यक आहे, त्यामुळे याबाबत मंडळाच्या आगामी बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही गांगुली यांनी सांगितले.