पुणे – महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे कृषी पदविच्या (बी.एसस्सी.) थेट द्वितीय वर्षाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मंगळवारपासून (दि.18) सुरुवात झाली आहे. अर्जाची अंतिम मुदत दि. 26 ऑगस्टपर्यंत राहणार आहे, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील या शैक्षणिक वर्षाच्या कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. या प्रवेशासाठी कृषी तंत्रनिकेतन पदविकेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यासाठी खुल्या गटासाठी 60 टक्के तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ : www.maha-agriadmission.in