पाटण (प्रतिनिधी) – करोनाची लक्षणे जाणवत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यामुळे करोना साखळी खंडीत करता येईल, असे प्रतिपादन सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
पाटण शहरातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय मृत्यूदरही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते.प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय आर. बी. पाटील उपस्थित होते.
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय नाही. या पर्यायासोबतच आपण अजूनही काही गोष्टींचा अवलंब केला तर ही साखळी लवकरात लवकर तोडून पाटण शहर करोनामुक्त करू शकतो. त्यासाठी लवकरात लवकर करोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क संपर्क साधणे आवश्यक आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने तत्काळ आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत शहरातील सर्व नागरिकांची माहीती गोळा करावी. करोनाची प्राथमिक लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांची संपर्क साधावा, असे आवाहन पाटणकर यांनी यावेळी केले.