रांजणगाव गणपती -कारेगाव (ता. शिरूर) येथील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने कारेगाव 30 दिवस बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून याबाबतचे परिपत्रक प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पारित केले आहे.
या बंदमुळे स्थानिक नागरिकांमध्ये व्यवसायाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीला करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कारेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वयंस्फूर्तीने कारेगाव बंद ठेवण्यात आले होते.
मात्र औद्योगिक वसाहत सुरू झाली तेव्हापासून कारेगावमध्ये कामगारांची ये-जा सुरू झाली. औद्योगिक वसाहतीत कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या कामगारांची संख्याही वाढली. करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास हे निमित्त पुरेसे ठरले.
औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या व तालुका प्रशासनाने कामगारांना वैद्यकीय तपासणी करून कामाला हजर केले असते तर आज गाव बंद करण्याची वेळ आली नसती, असे कारेगावचे सरपंच अनिल नवले यांनी सांगितले.