भोर- भोर तालुक्यातील पश्चिम भागातील भुतोंडे आणि हिर्डोशी खोऱ्यात तीन ते चार दिवस संततधार झालेल्या पावसाने भाटघर आणि नीरा देवघर धरण जलाशयांतील पाणीपातळीत वाढ होत आहे. चार दिवसांत 16 टक्के पाण्यासाठ्यात वाढ झाली आहे. भाटघर धरण जलाशयात 66 टक्के तर नीरा देवघर धरण जलाशयात 53.8 टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती धरण प्रकल्पाचे सूत्रांनी दिली आहे.
गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी भाटघर धरणात 41 टक्के पाणीसाठा झाला होता. सरासरी 244 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, मागील चार दिवस धरण जलाशय भागात 458 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी भाटघर धरण जलाशयात आजच्या तारखेला धरण जलाशयात 97.94 टक्के पाणीसाठा होता तर 1038 मिलीमीटर पाऊस झाला होता.
भाटघर धरण हे 24 टीएमसी क्षमतेचा प्रकल्प आहे. वीर धरणात 86.50 टक्के पाणीसाठा झाला आहे. वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण 83.39 टक्के भरले असून धरण भागात 1121 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
नीरा देवघरमध्ये 29 टक्के वाढ
ब्रिटीशकालीन धरण प्रकल्पाचे काम संपूर्ण चिरेबंदी दगडात केलेले आहे. धरणाला 45 स्वयंचलित मोऱ्या (दरवाजे) आहेत. नीरा देवघर धरण जलाशयात आजअखेर 998 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठ्यात 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे धरण मातीचे असून धरणाची पाणी साठवण क्षमता 12 टीएमसी इतकी आहे.
दोन धरणांतील पाण्याचा लाभ भोर तालुक्यासह पूर्वेकडील बारामती, इंदापूर, फलटणपासून सोलापूरपर्यंतच्या शेतीसाठी होत असतो. दोन्ही धरणांचे पाणी वीर धरण प्रकल्पात संकलित करुन ते पूर्वेकडे डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पुरवले जात आहे.