चेन्नाई – विमानतळावरील एका सीआयएसएफच्या अधिकाऱ्याने आपल्याला हिंदी येत नसल्याने तुम्ही भारतीय नागरीकच आहात का? असा अवमानास्पद प्रश्न आपल्याला केला असा आरोप करीत द्रमुकच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कनिमोळी यांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेच्या संबंधात आपल्या ट्विटरवर माहिती देताना त्यांनी म्हटले आहे की, विमानतळावरील सीआयएसएफचा एक अधिकारी हिंदीतून आपल्याला काही विचारत होता त्यावेळी मी त्याला एक तर तामिळीतून विचारा किंवा इंग्रजीतून विचारा अशी सुचना त्याला केली, त्यावेळी त्याने तुम्ही भारतीय आहात तर तुम्हाला हिंदी कसे येत नाहीत असा अवमानकारक प्रश्न विचारला असे त्यांनी म्हटले आहे. हिंदी येत असलेले लोकच भारतीय असतात काय असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणातील भाषिक फॉर्म्युल्याच्या विरोधात तामिळनाडूत सध्या संतप्त भावना आहे. या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने तामिळनाडुवरही हिंदी भाषेची सक्ती लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप केला जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर कनिमोळी यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेला राजकीय महत्व दिले जात आहे. सरकारी सुरक्षा अधिकाऱ्याकडून झालेला हा प्रकार हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रीया तामिळनाडुतील कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आता लोकांची भाषिक चाचणी घेतली जात आहे, आता आपल्यापुढे आणखी काय वाढून ठेवले असा सवालही त्यांनी केला आहे.