लासुर्णे -पिकवाढीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या युरियाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रातून युरियाविना माघारी फिरावे लागत आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे 10 ते 15 हजार टन खतांची मागणी असते. त्यातुलनेत पुरवठा कमी होत असल्याने खतांची टंचाई शेतकऱ्यांना सतावत आहे.
खरिपातील पिकांसाठी जादा पाऊस झाल्यास युरियाचा वापरतात. सध्या गेल्या दहा ते बारा दिवसांपासून खताचा तुटवडा जाणवत आहे. उत्पादन घटल्यामुळे खत टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी जादा आणि पुरवठा कमी, अशी अवस्था जिल्ह्यात झाली आहे. सध्या बारामती आणि पुणे येथे रासायनिक खतांची आवक होते. तिथून जिल्ह्यातील इतर तालुक्यात पाठविले जाते. गेल्या मार्च ते मे महिन्यांपर्यंत लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वच कंपन्यांकडून उत्पादन ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम आजही कृषी क्षेत्राला जाणवत आहे.
सध्या वाहतुकीच्या अडचणी, तसेच कामगार कमी असल्यामुळे देशातील मागणी पूर्ण करू शकत नाही. लासुर्णे येथील विनोद फर्टिलायझरचे विनोद गांधी म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांकडून युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर इतर खते घेतली जातात. युरिया नसल्यास इतर खतांना उठाव कमी असतो. आठ दिवसांत खते उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.