चेन्नई – विशेषत: हवामानाची स्थिती वाईट असताना कोझीकोडेचे कारीपूर विमानतळ हे असुरक्षित आहे. तेथे विमान उतरण्याची परवानगी देऊ नये, असा अहवाल नऊ वर्षांपूर्वी नागरी उड्डाण मंत्रालयाने नेमेलेल्या सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य कॅ. मोहन रंगनाथन यांनी दिला होता. मात्र त्या अहवालाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे शुक्रवारी झालेल्या अपघातामुळे स्पष्ट झाले आहे.
या अपघातात मरण पावलेले पायलट दीपक साठे यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची सर्वोत्कृष्ठ कॅडेटची तलवार मिळाली होती.
मंगलोरमध्ये विमान कोसळण्याच्या घटनेनंतर मी हा इशारा दिला होता. हा एक उतार असणारी “टेबलटॉप’ धावपट्टी आहे. धावपट्टीच्या अखेरीस असावी लागणारी रिकामी जागा (बफरझोन) अपुरी आहे. विमानतळाने ही जागा 240 मीटर असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात ती 90 मीटर आहे. याशिवाय त्याच्या एका बाजूला केवळ 75 मीटर रिकामी जागा आहे. प्रत्यक्षात 100 मीटर बंधनकारक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
टेबलटॉप धावपट्टीबाबत पावसाच्या काळातील वापराबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. 17 जून 2011ला नागरी उड्डाण सुरक्षा सल्लागार समितीच्या अध्यक्षांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्याच्या प्रती नागरी उड्डाण सचीव आणि नागरी उड्डाण माहासंचालकांना देण्यात आल्या होत्या. धावपट्टी 10 ला धावपट्टी अखेरीस अपुऱ्या जागेमुळे आणि धावपट्टी सुरक्षा जागा अपुरी असल्याने सुरक्षित नाही. तेथे हे सुरक्षा क्षेत्र 240 मीटरचे तातडीने तयार करावे असे आपण कळवले होते, असे रंगनाथन म्हणाले.