कोझिकोडे – एअर इंडियाच्या एक्सप्रेस IX-1344 विमानात प्रवास करणाऱ्यांसाठी कालचा शुक्रवार ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. हे विमान कोरोना महासाथीमुळे दुबई येथे अडकून पडलेल्या भारतीयांना वंदे भारत मोहिमेअंतर्गत मायदेशी घेऊन येत होतं. दीर्घ प्रतीक्षेनंतर मायदेशी परतण्यासाठी विमान तिकीट मिळाल्याने सर्व प्रवासी आनंदी होते. मात्र हा प्रवास आपल्या जीवनातील सर्वाधिक भयावह प्रवास ठरेल याची कोणी कल्पनाही केली नसेल.
या दुर्घटनेमध्ये १७ ते १८ जणांचा मृत्यू झाला असून वाचलेले बहुतांश प्रवाशी अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीयेत.
मूळचे कोझिकोडे येथील रहिवासी असलेले अश्रफ या दुर्घटनेतून बचावले असून त्यांच्यावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आपण या दुर्घटनेतून बचावलो असलो तरी मानसिक धक्क्यातून अद्याप सावरलो नाही असं ते सांगतात
या विमानातून १० बालके प्रवास करत होती अशी माहिती आहे. यातीलच एक असलेली ४ वर्षांची सैदाशेरिन आपली आई सुफैरा हिच्यासह दुर्घटनेतून सुखरूप बचावली आहे. मात्र तिचे वडील रमशाद हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत बोलताना रमशाद सांगतात, “नक्की काय होतंय हे आम्हाला समजलंच नाही. मात्र विमान जोरजोरात हालत होत.”
“विमान क्रॅश होताच आपत्कालीन दरवाजा उघडला. यानंतर प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला जीव वाचवण्यासाठी दरवाज्यातून उड्या मारल्या.” दुर्घटनेबाबत माहिती देताना एका अन्य प्रवाशाने सांगितलं.
“विमान क्रॅश झाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने हजर झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमींना रुग्णालयात पोहचवले.” अशी माहिती दुर्घटनेत जखमी झालेल्या अशिक नामक प्रवाशाने दिली.