‘नायडू’तील बत्ती गूल; 10 मिनिटांच्या भयनाट्यानंतर प्रशासनाची नेहमीप्रमाणे “बैठक’
पुणे – करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात सोमवारी रात्री उशिरा वीजपुरवठा खंडीत झाला. त्याचवेळी जनरेटरही सुरू न झाल्याने धावपळ उडाली. या काळात व्हेंटिलेटरवरील रुग्णांची जीवितहानी झाली नसली, तरी तशी शक्यता नाकारता येत नव्हती.
“रितीरिवाजाप्रमाणे’ या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने मंगळवारी दुपारी तातडीची बैठक घेतली. त्यात अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे जनरेटर तेथे नेण्याचा निर्णय झाला. मात्र, अन्य रुग्णालयांत अशी परिस्थिती उद्भवल्यास काय उपाययोजना करायची, याबाबत ऊहापोह झालाच नसल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न आहे.
डॉ. नायडू रुग्णालयातील वीजपुरवठा सोमवारी (दि.3) रात्री साडेअकरा वाजता खंडीत झाला. त्यानंतर जनरेटर तत्काळ सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, जनरेटरमध्ये नादुरुस्त असल्याने तो सुरूच झालाच नाही. तसेच व्हेंटिलेटरसाठी असलेला बॅटरीज्ही उतरलेल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. नातेवाईकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. “साहेब लाइट गेली, आमचा पेशंट आयसीयूमध्ये आहे.’ अशी आर्जव केली जात होती. सुदैवाने महावितरणने तत्काळ दुसऱ्या युनिटवर त्या परिसरातील सप्लाय टाकला आणि दहा मिनिटांनी लाइट आली. परंतू, हे “अंधारातले दहा मिनिटे’ सर्वांची धडकी भरवणारे होते. दरम्यान, याबाबत अतिरिक्त आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
…अन् अधिकाऱ्यांना आली जाग
डॉ. नायडू रुग्णालयातील जनरेटर हा सहा ते सात वर्षे जुना आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणेची माहिती घेतली. डॉ. नायडूमध्ये 10 आयसीयू बेड आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यावर डॉ. नायडू रुग्णालयातील जनरेटर सुस्थितीत सुरू आहे का? जुना असेल तर याठिकाणी नवीन जनरेटरची आवश्यकता आहे, की नाही? याची पाहणी आवश्यक होती. मात्र, घटना घडल्यावरच अधिकाऱ्यांना जाग येते आणि केवळ बैठका घेऊन प्रशासन किती तत्पर आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.