करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेच्या तपासाअंती जिल्ह्यात आता गृह विलगीकरणात उपचार करण्यात येणार आहेत. ते उपचार काय आणि कसे असतील, याबद्दल जनतेत संभ्रम होऊ नये म्हणून एक पुस्तिका ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ती “क्यूआर’ कोडसह सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. काय आहे गृह विलगीकरण, यावर प्रकाश टाकणारा हा आढावा…. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 80 टक्के करोनाबाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. या सर्वांचे आता गृह विलगीकरण करून उपचार करणे शक्य होणार आहे.
अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरांमध्ये योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांना घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देताना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
* रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून तो अतिसौम्य अथवा लक्षणे नसलेला आहे, हे प्रमाणित केल्यानंतर गृह विलगीकरणाबाबतची माहिती देतील.
* रुग्णांसाठी खेळती हवा आणि स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली खोली असणे, घरातील काळजी घेणारी व्यक्ती 24 तास उपलब्ध असणे आवश्यक आहे. नसल्यास रुग्णाची व्यवस्था कोव्हिड केअर सेंटरमध्ये करण्यात येईल.
* गृह विलगीकरणानंतर पुढील दहा दिवस रुग्णांची नियमित तपासणी फोनद्वारे करण्यात येईल.
* दहा दिवसांमध्ये कोणतेही लक्षण न आढळल्यास रुग्ण गृह विलगीकरण संपवू शकतो. विशेष म्हणजे विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा चाचणी करायची आवश्यकता राहणार नाही.
* करोनाचा रुग्ण बरा होईपर्यंत घरातील कोणीही व्यक्ती (55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली) इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, जुनाट यकृत, फुप्फुस, मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची पर्यायी व्यवस्था करावी.
* आरोग्य सेतू ऍप असणे आवश्यक. नोटिफिकेशन्स, ब्ल्यूटूथ आणि लोकेशन ट्रॅकिंग पूर्ण वेळ सुरू राहणे गरजेचे आहे.
* रुग्ण गृह विलगीकरणात असताना सतत संपर्कात येणाऱ्या गोष्टी, उदा – स्विच बोर्ड, खिडक्या, दरवाजांचे नॉब्ज्, खुर्च्या, जेवणाचे टेबल, कपाट इत्यादी वस्तू एक टक्का सोडियम हायपोक्लोराइटच्या साहाय्याने साफ कराव्यात.
जिल्ह्यात सध्या 29 कोव्हिड केअर सेंटर, 11 कोव्हिड हॉस्पिटल्स् आणि आठ कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. इतर शहरांमध्ये अशाच पद्धतीने करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठीच जिल्ह्यात आता गृह विलगीकरण हा पर्याय जिल्हा प्रशासनाने समोर आणला आहे.
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य वा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलऐवजी त्यांच्याच घरी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी आवाहन केले आहे. इतरांशी थेट संपर्क येण्यापासून स्वतःला दूर ठेवून विलगीकरण केल्यास, या विषाणूचा संसर्ग इतर व्यक्तींनाही होण्याची शक्यता कमी होते.
अशा वेळी वैद्यकीय मदत घ्या
काळजी घेणाऱ्या व्यक्तीने करोनाग्रस्त रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावे. रुग्णाला धाप लागली, श्वासोच्छ्वासात अडथळा येत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
मानसिक आरोग्य जपा
विलगीकरणाच्या काळात रुग्ण घरीच असला तरी त्याला आणि घरातल्या इतरांना मानसिक ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. मनावर दडपण येऊ शकते. अशा वेळी आपले मानसिक संतुलन नीट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुरेसा आहार आणि पुरेशी झोप घ्यावी. शक्य झाल्यास प्रतिकारशक्तीसाठी व्यायाम असावा. योग, ध्यानधारणा, छंदांची जोपासना, करमणूक, विरंगुळ्यासाठी ठेवलेला काळ, आपल्या आवडत्या व्यक्तींशी फोनवरून वा समाज माध्यमांवरून संवाद साधावा.