– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – “मुलगा, मुलगी समान आहे, दोघांना समान संपत्ती मिळाली पाहिजे’, “मुलीने चांगली सेवा केली आहे. मात्र, मुलगा मृत्यूनंतर तिला कवडी देणार नाही, तिलाही हिस्सा मिळाला पाहिजे’, “मृत्यूनंतर मुलांमध्ये वाद निर्माण होऊ नये’ आणि “संपत्तीचे वारस कोण आहे, हे ठविण्यासाठी मृत्यूपत्र करायचे आहे. त्याची प्रक्रिया काय आहे’, येथपासून ते “तातडीने करता येईल का,’ याची नागरिकांकडून वकिलांकडे विचारणा करण्यात येत आहे.
करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांमध्ये मृत्यूची भीती निर्माण झाली आहे. परिणामी, मृत्यूपत्राची चौकशीचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण वकिलांनी नोंदविले आहे.
करोनामुळे लॉकडाऊन लागू आहे. त्यात करोना रुग्णाची संख्या वाढत आहे. या काळात भविष्याची चिंता आणि करोनाच्या थैमानामुळे मृत्यूची भीती अनेकांपुढे निर्माण झाली आहे. आपल्यानंतर आपल्या वारसांचे काय होणार, आपली संपत्ती कोणताही त्रास न होता वारसांना कशी मिळेल, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. याविषयी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. सुभाष पवार म्हणाले, ‘व्यक्तीने स्वत: कमवलेली संपत्ती कोणाला द्यायची, हे ठरविण्याचे अधिकार कायद्याने त्याला दिले आहेत. त्यामुळे स्वत: कमवलेल्या संपत्तीचे नागरिक मृत्यूपत्र करू शकतात. याबरोबरच मुलांसोबत वाटणी झाल्यानंतर वाट्याला आलेल्या वडिलोपार्जित संपत्तीचे मृत्यूपत्र करता येते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर ते करता येईल का, लगेच करता येईला का, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, कोठे करावे लागेल, अशी विचारणा फोनवरून करण्यात येत आहे. यासह विविध दिवाणी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी दिवसाला 5 ते 10 फोन येत आहेत.’
शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ऍड. खंडेराव टाचले म्हणाले, “करोना परिस्थितीमुळे नागरिकांना मृत्यूची भीती वाटू लागली आहे. मृत्यूनंतर संपत्तीचे वाद होऊ नये, यासाठी 50 ते 60 वर्षांवरील व्यक्तीकडून मृत्यूपत्राबाबत अधिक विचारणा होत आहे. विशेषत: रक्तदाब, मधुमेह आणि अन्य आजार असलेल्या व्यक्तींचे विचारणांऱ्यामध्ये जास्त प्रमाण आहे. मात्र, मृत्युपत्र तयार करताना संबंधित व्यक्तीचे आरोग्य चांगले होते, असे प्रमाणपत्र डॉक्टरकडून घ्यावे लागते. तसेच ते किमान दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत करावे लागते.’