कोपरगाव (प्रतिनिधी) – करोना महामारीच्या संकटामुळे अगोदरच राज्यातील दूध उत्पादक व शेतकरी अडचणीत आहेत. मात्र राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. या निद्रिस्त सरकारला आता जाग आणण्याची गरज असून, जोपर्यंत शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी दिला.
भाजप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाइं या मित्रपक्षांच्या वतीने राज्यभर महाएल्गार आंदोलन करण्यात आले. प्रदेश सचिव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मतदारसंघातील सुमारे 78 दूध संकलन केंद्रांवर आज आंदोलन करण्यात आले. चांदेकसारे (झगडे फाटा) येथे झालेल्या आंदोलनाप्रसंगी कोल्हे बोलत होत्या. महाआघाडी सरकारच्या काळात सर्वांत जास्त फटका शेतकरी व दूध उत्पादकांना बसला आहे. राज्य शासनातील सहभागी पक्ष आपापसांतील रूसवे फुगवे काढण्यातच व्यस्त असल्याने त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला असल्याचे कोल्हे म्हणाल्या.
जोपर्यंत शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे कोल्हे म्हणाल्या. यावेळी नितीन कापसे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष कैलास खैरे, केशवराव भवर, संजय होन, दीपक गायकवाड, राजेंद्र जानराव, संदीप कांदळकर, विलास होन, हरिभाऊ गिरमे, चंद्रकांत औताडे, अप्पासाहेब औताडे, ऍड. ज्ञानेश्वर होन, धनंजय माळी, गणेश राऊत, रमेश औताडे, योगिता होन, सरपंच पूनम खरात, विजय होन, व्ही. टी. होन, किरण होन, सखाहरी राऊत, मच्छिंद्र जावळे आदी उपस्थित होते.