निमसाखर -दुबार पेरणीचे संकट टळू दे रे देवा! असे साकडे नंदिकेश्वराकडे घालत या भागातील शेतकऱ्यांनी हर हर महादेव!! चा जय घोष केला.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही वरुणराजा प्रसन्न आहे. यंदाही म्हणजे जून महिन्यातील मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झाली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रात्रीचा झालेल्या जोरदार पावसामुळे कळंब-बावडा पालखीमार्ग बंद झाला होता. तेव्हापासून निमसाखर व परिसरातील काही ओढे-नाले आजही वाहत आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतातील काही विहिरी वगळता सर्रास शेतविहिरी काठोकाठ भरल्या आहेत. शेतात गवताचे प्रमाण वाढले आहे. पेरणी केलेली पिके शेतातील पाणी हटत नसल्याने पिकांची मुळे नासून गेली आहेत. शेतामध्ये अतिरिक्त ओलीमुळे गवतांचे प्रमाण वाढल्याने शेतकरी आणखी चिंताग्रस्त पहावयास मिळत आहे.असाच पाऊस सुरू राहिला तर या भागामध्ये ओला दुष्काळ पडू शकतो.
यामुळे पिके धोक्यात आली आहेत. काही ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्या लवकरच होऊ दे रे। असे साकडे नंदिकेश्वराच्या चरणी श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर बाहेरुन दर्शन घेत साकडे घातले.