राहाता (प्रतिनिधी) – नगर-मनमाड राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वत: हातात फावडे व घमेले घेऊन वाळू, खडी व सिमेंटच्या साह्याने खड्डे बुजवून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी गांधीगिरी केले.
नगर-मनमाड महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. याबाबत नगराध्यक्षा पिपाडा यांनी वारंवार हे खड्डे बुजविण्याची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे नगराध्यक्षा पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी स्वतः हातात फावडे व घमेले घेऊन हे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. तसेच संबंधित विभागाचा निषेध केला.
रस्त्यावर कुठेही रेड फ्लॅशर्स, दिशा दर्शक बसविलेले नाही. रस्त्याच्या दुभाजकांमध्ये अनावश्यक जागा सोडलेली आहे. रस्त्याच्या साईडने मारलले पांढरे व लाल पट्टे दिसेनासे झाले आहेत. शहरातुन जाणारा रस्ता वाहतुकीस योग्य राहिला नाही. काही ठिकाणी डांबराचे थर गोळा होवून उचवटे तयार झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता अपघातांना निमंत्रण देत आहे.
हा सर्व प्रकार गंभीर असून, याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी डॉ.पिपाडा यांनी दूरध्वनीवर संपर्क करुन याबाबत अधिकाऱ्यांना तातडीने सूचना करण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यावर चव्हाण यांनी खड्डे बुजविण्याचे आश्वास दिल्याचेही पिपाडा यांनी सांगितले.