-अरुण गोखले
नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला वहिला आणि सर्व महिला, मुली ह्यांना हवाहवासा वाटणारा सण. या दिवशी नटायचं, मुरडायचं, वेगवेगळ्या वेशभूषा करायच्या आणि मैत्रिणींना गोळा करून सर्वांनी नाचत गाणी गात, चल गं सखे वारुळाला, वारुळाला। नागोबाला पुजायला।। असे म्हणत निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन नागदेवतेची पूजा करायची, असा हा दिवस.
भारतीय संस्कृतीने सर्व प्राणिमात्रांच्या ठायी ईश्वरीतत्त्व शोधण्याची, पाहण्याची शिकवण दिलेली आहे. नाग हा पर्यावरणसृष्टीतील एक सरपटणारा प्राणी. नाग म्हटला की, आपल्या मनात दंश, त्याचे शरीरात भिनणारे विष आणि मृत्यू या गोष्टी येतात. खरं तर प्राणिशास्त्राचे अभ्यासक असे सांगतात की, नाग स्वत:हून कोणाला त्रास करीत नाही. आपल्या संस्कृतीने नागास देवता मानून त्यास पूजनीय, वंदनीय ठरविलेले आहे. तसेच विष्णू, शंकर, गणेश आदी देवतांचे तर नाग हे एक भूषण आहे.
भारत हा कृषिप्रधान देश. नाग हा शेतकऱ्याचा मित्र. कृतज्ञतेच्या भावनेतूनच नागास देवतेचे रूप देऊन त्याची पूजा करण्याचा दिवस. या दिवशी घरात पाटावर गंधाने नाग, नागीण आणि त्यांची पिल्ले काढून पूजा करावी, नाग स्तोत्र म्हणावे, दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवावा आणि सर्वतोपरी रक्षणाची प्रार्थना करावी, असे आपल्या धर्मशास्त्राने सांगितले आहे. काही ठिकाणी तर नागास भाऊ मानण्याची आणि त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. या नागपंचमीच्या निमित्याने नाग पकडायचे, त्यांचे दात काढायचे. त्यांना टोपलीत कोंडायचे आणि त्यांचा व्यावसायिक उपयोग करायचा, असे कोठेही सांगितलेले नाही.
या दिवशी नागपूजेनंतर आवर्जून वाचली जाणारी कहाणीसुद्धा उद्बोधक आहे. एका शेतकऱ्याच्या हातून शेत नांगरताना नागाची पिल्ले चुकून मारली जातात. नागीण सुडाच्या भावनेने त्या शेतकऱ्याच्या घरच्यांना दंश करते. दूरच्या त्याच्या मुलीकडेही तिला मारायला जाते. पण तिने आपली केलेली पूजा, लाह्या दुधाचा दाखविलेला नैवेद्य हे पाहून प्रसन्न होते. तिच्या पित्याच्या हातून नकळत घडलेल्या चुकीला क्षमा करते. अशी ही दुष्ट प्रवृत्तीवर मात करायला आणि क्षमाशील व्हायला शिकवणारी गोष्ट, वाचनीय व अनुकरणीय आहे.
या सणाला संध्याकाळी मुली, महिला श्रावण गीते गाऊन, झोक्यावर झुलून, फेर, नाच गाणी करून आनंद व्यक्त करतात. या खेळाच्या माध्यमातून त्यांच्या मनावरचा ताण कमी होणे, मन प्रसन्न होणे, उत्साह वाढणे हे फायदे होतात.