जयपूर – सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमध्ये देखील मध्यप्रदेशची पुनरावृत्ती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दाखवलेल्या राजकीय चातुर्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकार टिकण्याबाबत आशा कायम आहेत. अशातच आज राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांना आणखी एक यश मिळालं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतीय ट्रायबल पक्षाच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्या उपस्थितीमध्ये सरकारला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे पायलट यांच्या बंडापूर्वी काँग्रेस सरकारला पाठिंबा दिलेल्या भारतीय ट्रायबल पक्षातर्फे काही दिवसांपूर्वी आपल्या दोन आमदारांना विश्वासदर्शक चाचणीदरम्यान तटस्थ राहण्याचे आदेश बजावण्यात आले होते.
मात्र आज गेहलोत यांच्या उपस्थितीमध्ये या दोन आमदारांनी काँग्रेस सरकारला आपला पाठिंबा कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. काँग्रेसला पाठिंबा कायम ठेवणाऱ्या आमदारांनी ट्रायबल पक्षाच्या कार्यकारणीशी देखील चर्चा झाल्याचे सांगितले असून पाठिंब्याबाबत त्यांच्याकडूनही होकार आल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री अशोकी गेहलोत यांनी ट्विटरद्वारे माहिती देताना, “ट्रायबल पक्षाच्या दोन्ही आमदारांनी त्यांच्या पक्षातील कार्यकारणीसोबत चर्चा करून काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलंय.” असं सांगितलं.