कैदी पळाल्यानंतर आता बंदोबस्तावरून कलगीतुरा
पुणे – करोना होऊ नये यासाठी येरवडा येथे उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातून गुरुवारी पहाटे पाच कैद्यांनी खिडकीचे गज कापून पलायन केले. यात तिघे सराईत असून, त्यांच्यावर मोक्काचा गुन्हा दाखल आहे. एकाच वेळी पाच कैद्यांनी पलायन केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या कारागृहातील कैदी पळून गेल्याची ही चौथी घटना आहे. यातच तात्पुरत्या कारागृहाच्या बंदोबस्तवरून प्रशासन आणि शहर पोलीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. कारागृह प्रशासनाने ही जबाबदारी शहर पोलिसांवर ढकलली आहे.
एका कैद्याला पळून जाताना पोलिसांनी पकडले, तर इतर कैदी पलायनात यशस्वी ठरले. करोनामुळे उभारलेले तात्पुरते तुरुंगांचा बंदोबस्त भेदून कैदी राजरोसपणे पळून जात आहे. मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील कैदी तात्पुरत्या कारागृहात कसे ठेवले गेले हाही महत्त्वाचा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे.
करोना पार्श्वभूमीवर जातपडताळणी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शासकीय वसतिगृहात तात्पुरते कारागृह उभारले असून नवीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर येथे ठेवण्यात येते. वरील पाच कैद्यांना इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ठेवले होते. पहाटे चारला कैदी खोलीत दिसले नाही तेव्हा पोलिसांनी तपासणी केली. त्यात बाथरूमच्या खिडकीचे गज कापून ते पसार झाल्याचे निदर्शनास आले. देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण आणि गणेश चव्हाण हे दौंड परिसरातील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत ही कारवाई केली आहे. खुनाचा प्रयत्न, खंडणी, चोरी अशाप्रकारचे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजिंक्य कांबळे याच्यावर, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सनी पिंटो याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे. सध्या येथे 568 कच्चे कैदी आहेत, परंतु क्षमता मात्र 250 जणांची आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाकडील दोन अधिकारी, बारा कर्मचारी, तर कारागृह विभागाचा एक अधिकारी व कर्मचारी असा बंदोबस्त तैनात आहे. येथील दरवाजा, खिडक्या इतक्या मजबूत नाहीत. याशिवाय, आजूबाजूचा परिसर निर्जन आहे. सहज कैदी सुरक्षारक्षकांच्या नजरेआड होऊ शकतात. यामुळे रात्रीच्या वेळी कैदी पलायनात यशस्वी होत आहेत.
कैदी पलायन करण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणखी वाढविण्याची विनंती करण्यात येणार आहे. सुरक्षेची जबाबदारी कारागृह प्रशासन व शहर पोलिसांची आहे. वसतिगृह जुने असल्यामुळे दरवाजे, खिडक्या मजबूत नाहीत. यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून काळजी घेतली जाईल.
– यू. टी. पवार, कारागृह अधीक्षक येरवडा