नवी दिल्ली: देशातील करोनाग्रस्तांचा आकडा याच आठवड्यात दहा लाखांवर जाण्याची भीती कॉंग्रेस नेते राहुूल गांधी यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटरवर ही भीती व्यक्त करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांच्या वक्तव्यांचाही दाखला दिला आहे. जगातील करोनाच्या स्थितीवर कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर ही स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिला आहे.
भारतात सध्या 9 लाख 6 हजार करोनाग्रस्त असून त्यात रोज किमान 24 हजार नागरिकांची भर पडत आहे. या हिशेबाने हा आकडा याच आठवड्यात दहा लाखांवर जाईल, अशी शक्यता राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
भारतातील करोनाची स्थिती अधिक चांगली हाताळण्यात येत आहे असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा यांनी काल केले होते. त्यांच्या वक्तव्यावरही काल राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला होता. आज या संबंधात लागोपाठ दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा करोना स्थितीवर भाष्य करताना मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.