कोल्हापूर : दुधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यास आता विरोध वाढतोय. कागल तालुक्यातील बिद्री या ठिकाणी नदीकाठावरील नागरिकांनी सुमारे 4 तास रास्ता रोखून धरला. इचलकरंजीला पाणी देण्यावरून नवा वाद निर्माण झाला असून या आंदोलनात कागल ,राधानगरी, करवीर आणि भुदरगड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला.
इचलकरंजीला पाणी देण्यावरून आता मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. इचलकरंजी शहराच्या ‘पाणी उशाला तर मग दुधगंगा नदीतून पाणी कशाला’ असा प्रश्न जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला. कागल तालुक्याच्या सुळकूड पाणी योजनेतून इचलकरंजी शहराला पाणी देण्याचा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाला. पण याला कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातून विरोध केलाय.
संघर्ष करून आम्ही पाणी मिळवलंय तर मग आमच्या वाट्याचे पाणी इचलकरंजी शहराला का द्यायचं असा सवाल उपस्थित होत आहे. पंचगंगा नदी इचलकरंजी शहराच्या जवळ आहे. असे असताना सुळकूडमधून पाणी घेण्यापेक्षा पंचगंगा नदीतून पाणी का घेत नाही असं विचारण्यात येत आहे. आम्ही तर पाणी देणारच नाही असं म्हणत भविष्यात प्रसंगी हायवे रोको करू, पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करू मात्र इचलकरंजी ला पाणी देणार नाही असा इशारा भाजपा चे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.
न्याय मागणीसाठी आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवला असून एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना देखीलआंदोलकांना सोशल डिस्टनसिंगच भान राहील नाही.