ढाका – बांगलादेशातील उत्तरेकडील सात जिल्ह्यांमधील सर्व प्रमुख नद्यांना पूर आलेला आहे. गेल्या 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे तेथील पूरस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. रंगपूर, निलफामरी, लालमनीरहाट, कुरीग्राम, गायबंधा, जमालपूर आणि बागगुरा या उत्तरेकडील जिल्ह्यांमधील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत.
पूर पूर्वानुमान आणि चेतावनी केंद्राच्या ताज्या अहवालानुसार ब्रह्मपुत्र खोऱ्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागल्या आहेत. तीस्ता नदी डालिया आणि कौनिया, कुरीग्राम येथील धरलामध्ये धोक्याच्या खुणेवरून वाहते आहे. तर ब्रह्मपुत्र नदी नूनखावा आणि चिलमरी येथे धोक्याच्या पातळीवरून वाहते आहे. जमुना नदी फुलचारी आणि बहादराबाद येथे आणि सिंग्रा येथील गुर येथे धोक्याच्या पातळीच्या वरून वाहते आहे.
मेहग्ना खोऱ्यातील काही नद्याही धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असल्याची माहिती आहे. तर सुरमा आणि इतर लहान नद्या कनिघाट आणि सिल्हेट येथे धोक्याच्या पातळीच्या वर आहेत. मात्र, रविवारी दुपारी गंगा नदीच्या खोऱ्यातील एकाही नदीचे पात्र धोक्याच्या पातळीवर गेलेले नाही. आगामी 24 तासात जोरदार पावसाची शक्यता असल्याने पूरस्थिती आणखीन बिघडण्याची शक्यता आहे.