नगर -जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत बाजरी, सोयाबीन बियाणे निकृष्ट पुरवठा केल्यामुळे उगवण झाली नसल्याबाबत आत्तापर्यंत 768 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. याबाबत पंचनामे करून बियाणे उगवण झाली नसल्याचे तालुका तक्रार निवारण समितीने स्पष्ट केले.
त्यामुळे निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातौंडे यांनी केली आहे. संभाजी दहातोंडे यांनी बुधवारी (दि.8) रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांना निवेदन दिले आहे. याबाबत कोपरगाव व पारनेर येथे प्रत्येकी एका कंपनीवर गुन्हा दाखल केला असून, तब्बल 31 कंपन्यांनी निकृष्ट बियाणे पुरवठा केलेला आहे.
इतर कंपन्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही? त्यांना कोण पाठीशी घालत आहे? याची चौकशी करून निकृष्ट बियाणे पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत. निकृष्ट बियाणे देणाऱ्या कंपन्यांना राज्यात बियाणे विक्री करण्याला बंदी घालावी. मुख्यमंत्री यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून कारवाई करावी.