नवी दिल्ली- सध्या करोना प्रादुर्भाव वाढत चालला असून या काळात बिहार विधानसभेच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही, असे लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले आहे. येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात या निवडणुका होणार आहेत. त्याविषयी निवडणूक आयोगाने अजून कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. तथापि, सध्याचा काळ ही निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास अनुकूल नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
करोनाच्या काळात मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्याची शक्यता नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सामान्य लोकांच्या आरोग्याच्या हिताची काळजी घेऊनच याविषयी निर्णय केलेला बरा. लोकांना धोक्यात घालून निवडणूक प्रक्रिया या काळात राबवणे हे लोकशाहीच्याही हिताचे नाही, असेही चिराग पासवान यांनी म्हटले आहे. लोकजनशक्ती पक्ष हा भाजपचा घटक पक्ष असल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या मताला महत्त्व दिले जात आहे.