नवी दिल्ली- देशात वाढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येची आम्हाला चिंता वाटत नाही. कारण आम्ही चाचण्यांची संख्या वाढवली आहे. अधिकाधिक बाधित शोधून त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरे करण्याचे सरकारचे धोरण आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी दिली. भारताने बाधितांच्या संख्येचा आठ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्या पार्श्वभूमीवर हर्ष वर्धन बोलत होते.
आरोग्यमंत्री म्हणाले, देशातील बाधित बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के आहे. तर मृतांचे प्रमाण केवळ 2.71 टक्के आहे. देशात बाधितांची संख्या वेगाने वाढत असली तरी अद्याप सामूहिक संसर्ग झाला नाही. मात्र, काही भागात स्थानिक पातळीवर त्याचा उद्रेक झाल्याचे आढळत आहे. देशात दररोज दोन लाख 70 हजार चाचण्या करण्यात येत आहेत.
त्तत्पूर्वी, देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक म्हणजे 26 हजार 502 नवे बाधित सापडले. तर 475 जण करोनाने मरण पावले. त्यामुळे बाधितांच्या संख्येने आठ लाखांचा टप्पा ओलांडला. या बाधितांपैकी चार लाख 95 हजार जण ठणठणीत बरे झाले असून देशात सध्या दोन लाख 76 हजार 685 बधित असल्याचे त्यांनी सांगितले. बरे झालेल्या आणि सक्रिय बाधितांमध्ये दोन लाख जणांचा फरक पडला आहे.