1983 च्या विश्वकरंडक विजयाला उजाळा
पुणे(दि. 25) – ये रन्स जितने के लिये काफी नहीं है लेकिन लडने के लिये काफी है, तो चलो लड लेते है। हे कपिल देवचे शब्द खेळाडूंनी ऐकले आणि चमत्कार घडला. जागतिक क्रिकेटचे तत्कालीन बॉस वेस्ट इंडिजच्या संघाला भारतीय संघाने धोबीपछाड केले व 1983 साली झालेली एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा जिंकली, अशा शब्दांत संघातील एक प्रमुख गोलंदाज बलविंदरसिंग संधू यांनी या विजेतेपदाच्या प्रवासाला उजाळा दिला. हा दिवस होता 25 जून 1983.
जागतिक क्रिकेटची राजधानी असलेल्या ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर 37 वर्षांपूर्वी हा भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील अंतिम सामना झाला. 60 षटकांच्या अशा सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना 54.4 षटकांत 183 धावांवर गारद झाला होता. यावेळी वेस्ट इंडिजची भक्कम फलंदाजी पाहता हा सामना काही आपण जिंकणार नाही हे लक्षात आल्याने भारतीय क्रिकेटपटू माना खाली घालून बसले होते.
एका वार्ताहराशी बोलून कर्णधार कपिलदेव ड्रेसिंगरूममध्ये परतले व त्यांनी हे निराशाजनक चित्र पाहिले. ये रन्स जितने के लिये काफी नहीं है लेकिन लडने के लिये काफी है, तो चलो लड लेते है। हे वाक्य त्यांनी उच्चारले. मात्र, सर्व खेळाडूंच्या डोळ्यात चमक निर्माण झाली आणि पुढे घडला तो इतिहास ठरला.
मध्यमगती गोलंदाज बलविंदरसिंग संधू यांनी अफलातून इनस्विंगरवर सलामीवीर गार्डन ग्रिनीजचा त्रिफळा उडवला त्यावेळी त्यांची अवस्था 1 बाद 5 अशी झाली तर, पुढील 61 धावांत त्यांची स्थिती 5 बाद 66 बनली.
त्यावेळी व्हिव रिचर्ड्स मैदानात आला व आपल्या बेदरकार पद्धतीने फलंदाजी करू लागला. हा एकटाच सामना फिरविणार असे दिसत असतानात चमत्कार घडला. त्याने मारलेला पूलचा फटका कपिलदेवने विरुद्ध दिशेने पळत जाऊन एक अविश्वसनीय झेल घेत रिचर्ड्स यांची खेळी संपुष्टात आणली व त्यानंतर मोहिंदर अमरनाथ यांच्या मध्यमगती गोलंदाजी व सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा डाव 140 धावांवर संपुष्टात आणला व भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा 43 धावांनी पराभव करत प्रथमच विश्वकरंडकाला गवसणी घातली.
लता दीदींच्या कार्यक्रमातून जमवला निधी
महेंद्रसिंग धोनीच्या संघाने 2011 साली विश्वकरंडक स्पर्धा जिंकली तेव्हा संघातील सर्व खेळाडूंना बीसीसीआयने कोट्यधीश बनवले. मात्र, 1983 साली बीसीसीआयची अवस्था आजच्यासारखी श्रीमंती थाटाची नव्हती. खेळाडूंना देण्यासाठी पैसेच नव्हते. त्यावेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विनंती करून त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला व त्यातून मिळालेल्या निधीतून भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले, अशी आठवणही संधू यांनी सांगितली.