पिंपरी – जून महिन्याच्या सुरुवातीला प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील व्यवसाय पूर्ववत सुरू झाले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात रिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. मात्र, रिक्षामधून दोनच प्रवासी नेण्याची मुभा आणि रिक्षात बसण्यास प्रवाशांच्या मनात असलेली भीती यामुळे दिवसभर थांबूनही रिक्षाचालकांची चार पैसे मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यामुळे, उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लावताना रिक्षाचालकांना कसरत करावी लागत आहे.
करोनाच्या काळात जनजीवन विस्कळीत झाले आहे. ते पूर्वपदावर आणण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. परंतु रिक्षाचालकांची पोटासाठी सुरू असलेली कसरत अजूनही थांबलेली नाही. पिंपरी-चिंचवड शहरात हजारो रिक्षाचालक असून, टाळेबंदीमुळे मागील तीन महिने रिक्षा व्यावसाय बंद आहे. त्यामुळे, अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या रिक्षा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली असली तरी रिक्षामध्ये दोनच प्रवासी बसविण्याच्या अटीमुळे व्यवसाय परवडत नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. सध्या रिक्षामध्ये एका वेळी केवळ दोन प्रवासी बसविण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु शासनाने भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे तीन असन क्षमता असणारी रिक्षा चालकाला चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे रिक्षाचालक आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत.
अनेक रिक्षाचालकांनी बॅंका, पतसंस्थांमधून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केल्या आहेत. काहींनी घर बांधणे, मुलांचे शिक्षण यासाठी कर्ज घेतले आहे. जे थोडेफार पैसे होते ते लॉकडाऊनच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खर्च झाले. आता हातामध्ये पैसे नाहीत, काही बॅंकांनी हप्ते भरण्यासाठी सवलत दिली असली तरी येणाऱ्या काळात कर्जाचे हप्ते भरले पाहिजेत, याची चिंता आता रिक्षाचालकांनी सतावू लागली आहे. सध्या रिक्षाचालक प्रतिकूल परिस्थितीमध्ये व्यवसाय करीत असून, सरकारने याची दखल घेऊन रिक्षाचालकांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.
भाडेवाढ करणे गरजेचे
शासनाने रिक्षांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. परंतु केवळ दोन प्रवासी बसविण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना रिक्षा चालवणे कठीण झाले आहे. त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तीन प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना रिक्षांना आहे. परंतु करोनामुळे हे शक्य नाही. तेव्हा रिक्षाचे भाडेवाढ करणे गरजेचे आहे. असे रिक्षाचालकांचे मत आहे.
मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे व्यवसाय बंद आहे. सध्या रिक्षा व्यवसायाला काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. परंतु दोनच प्रवाशांची ने-आण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यांचा ताळमेळ लावणे कठीण झाले आहे.
– सागर कोळी, रिक्षाचालक