करोनामुळे आयात नाही : पुढील दोन महिने अशीच स्थिती राहण्याचा अंदाज
पुणे – करोना पार्श्वभूमीवर परदेशातून खाद्यतेलाची आयात होऊ शकली नाही. त्यामुळे सध्या बाजारात मागणी अधिक आणि आयात कमी अशी स्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून शहरासह राज्यात खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात भावात वाढ झाली आहे. हेच भाव आणखी दोन ते तीन महिने टिकून राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी सुमारे 70 टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते. तर देशात मागणीच्या 30 टक्के खाद्यतेलाची निर्मिती केली जाते. सन 2019 मध्ये 8 लाख टन तेलाची आयात करण्यात आली होती. यंदा 4 लाख टनाची आयात झाली आहे. आयातीचे प्रमाण तब्बल 50 टक्क्यांनी घटले आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे राज्यातील तेलनिर्मिती करणारे कारखाने अद्याप बंद आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाचा काही अंशी तुटवडा जाणवत आहे.
तुटवड्यामुळे पामतेलाच्या डब्यामागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. सूर्यफुल तेलाच्या डब्याच्या भावात 50 रुपये, तर सोयाबीन तेलाच्या भावात 30 रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही किलोच्या भावात 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ आणखी काहीकाळ कायम राहणार असल्याची माहिती व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली.
नहार म्हणाले, शहरातील हॉटेल्स, खानावळी, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पाम तेलाला मागणी असते. तर घरगुती ग्राहकांकडून सूर्यफुल आणि शेंगदाणा तेलाला मागणी असते. विशेषत: आपल्याकडे इंडोनेशिया, मलेशिया, अर्जिटिना आणि युक्रेन या देशांतून खाद्यतेलाची आयात होते. घाऊक आणि किरकोळ बाजारात पाम तेलाला सर्वाधिक मागणी असते.