मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनने आक्रमण केले हे मान्य करायला तयार नाहीत. मग 20 सैनिक कसे मारले गेले. 20 सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. तसेच देशाच्या संरक्षणासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत असून सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही पंतप्रधानांसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, चीन भारताच्या हद्दीत आला नसल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनने आक्रमण केल्याचे मान्य करायला तयार नाहीत. मग 20 सैनिक कसे मारले गेले. 1967 नंतर आजपर्यंत चीनच्या सीमेवर कोणत्याही सैनिकाने आपले प्राण गमावलेले नाही. 20 सैनिक मारले जाणं ही संख्या कमी नाही, याची जबाबदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल. सगळ्यांनी हात वर करून कसं चालेल, असा सवाल त्यांनी केला.
चीन-भारत सीमाभागात काहीच झाले नाही, असं म्हणूण कसे चालेल, सर्व भारतीयांच्या मनात हा प्रश्न आहे. याचं उत्तर लष्करप्रमुख, संरक्षणमंत्री किंवा पंतप्रधानांनी द्यायला हवे. एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका घ्यायला हवी. याबाबत आम्ही सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून पंतप्रधानांच्या सोबत आहोत, पण सत्य समोर यायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.