मुंबई- निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या नुकसानग्रस्तांना आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या व्हिडिओ कॉन्फरन्सला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते सर्व केले जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तत्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे. या कालावधीत प्रशासनानेही चांगले काम केले आहे. ही मदत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळबागा वाचविण्यासाठी निश्चित असे धोरण लवकरच आखण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
समन्वयाने काम करण्याचे निर्देश
कोकणवासियांना आजपर्यंत कमी मदत मिळत गेलेली आहे. परंतु आता निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नुकसानग्रस्तांना आणखी वाढीव निधी आजच वितरित करण्यात येईल. हा निधी योग्य त्या नुकसानग्रस्तांना मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी यावेळी दिले.